साने गुरुजींची 85 वर्षीय कन्या सुधाताईना निमंत्रण
जळगाव/कार्यकारी संपादक/तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तब्बल 75 वर्षानंतर अमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन २ फेब्रुवारीपासून तीन दिवस आयोजित होणार आहे. या संमेलनाची रूपरेषा,आयोजन आणि नियोजन हे परंपरेप्रमाणे अतिशय भव्य असेल, यासाठी सुमारे 5 कोटींचा निधी उभारावा लागणार आहे, अशी माहिती अमळनेर आयोजक संस्था मराठी वाङमय संस्थेचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी येथे सहविचार बैठकीत दिली. जळगाव येथील व. वा.वाचनालयाच्या सभागृहात त्यांचेसमवेत नरेंद्र निकुंभ यांनी सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. आयोजन आणि नियोजनात सर्व साहित्य रसिकांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून जळगाव शहरातील साहित्य रसिकांची ही बैठक घेण्यात आली.
प्रा.विजय लोहार यांनी प्रास्ताविक केले. आम्ही सादर केलेले नियोजन आवडल्यामुळे महामंडळाने आयोजनाची संधी दिली, संमेलनात मंचावर ३० टक्के खान्देशी साहित्यिकांना मंचावर संधी असेल, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असेल, पूज्य साने गुरुजींनी “सुधास पत्रे” ज्यांना उद्देशून लिहिली त्या बडोदा येथे स्थायिक असलेल्या त्यांच्या ८५ वर्षीय कन्या सुधाताई यांचे उपस्थितीसाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले. चर्चेत ऍड.सुशील अत्रे, प्रा.शरदचंद्र छापेकर,माजी प्राचार्य सुभाष महाले आदिनी सहभाग घेत सूचना मांडल्या. डॉ.जोशी व कार्यवाह नरेंद्र निकुंभ यांनी उपस्थित्यांच्या शंकांचे निरसन केले.या ऐतिहासिक साहित्यिक चळवळीत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक संस्थेचे डॉ. अविनाश जोशी, नरेंद्र निकुंभ यांनी केले व. वा.वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी सहविचार सभा झाली.