जळगाव/तुषार वाघुळदे कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- लग्न जुळवून देतो असे सांगून जिल्ह्यातच नव्हे तर अन्य ठिकाणी अनेकांची फसवणुकीचे प्रकार घडले आहे. जळगाव शहरातील एका ३० वर्षीय तरुणाला विवाह लावून देण्याच्या आमिषाखाली नागपूर जिल्ह्यात आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत तरुणाच्या तक्रारीवरून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. घटनेची नागपूर पोलीस माहिती घेत आहेत. विवाह लावून देणारी एजंटांची टोळी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीत ३० वर्षीय तरुण आई, वडील, भाऊ यांच्यासह राहतो. त्याला एजंट विसनजी टारजन याने लग्नासाठी गोंदियाचे स्थळ सुचविले होते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात तरुणाचे आई, मामा व नातेवाईक हे दहिगाव पथोडीया ता. आमगाव येथे गेले होते. मुलगी पाहिल्यानंतर पसंत पडली. त्यानुसार १० जून रोजी नारळ गोटा झाला. त्यावेळी १० हजार रुपये मुलीच्या नातेवाईकांनी घेतले. त्यानंतर लग्नाची २२ तारीख ठरली. त्यानुसार नागपूर शहरातील कुराडी मंदिरात २२ जून रोजी मुलाचे व मुलीचे दोन्हीकडील नातेवाईक यांच्या उपस्थितीत हळद लावून विवाह पार पडला त्यावेळी १ लाख ४० हजार रुपये मुलीकडच्यांनी घेतले होते.त्यानंतर बिदाई झाल्यावर नागपूर शहर सोडल्यावर काही अंतरावर काही ४ ते ५ संशयितांनी त्यांचे वाहन अडवून वधूला नेण्यासाठी हट्ट धरला.
एकाने तर, ही माझी बायको आहे. हिला कोठे नेत आहात ? असे विचारून वधूला घेऊन गेले. त्यावेळी मुलीच्या घरच्यांना मुलाने जाब विचारण्यासाठी गेले. तर त्यांनी त्याला हाकलून लावले. आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ते घाबरून गेले. दरम्यान, एजंट टारजन याला विचारले असता, त्यानेही हात वर केले.
मुलगा व त्याचे कुटुंबीय हताश होऊन ते जळगावी परतले असून, याबाबत आता नागपूर पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याची माहिती तरुणाने दिली आहे. दरम्यान, मुली दाखविणारे एजंटांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी
केले आहे. आता यापुढे सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून याआधी सुद्धा अनेकांची फसवणूक झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील विशेषतः यावल,रावेर ,भुसावळ आणि चोपडा या भागात ‘ मी लग्नासाठी चांगले स्थळ दाखवितो ‘ असे म्हणणारी नव्हे तर एजंटच मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत . जी मुलगी दाखवली जाते ,तिचे आधीच अनेकवेळा लग्न झालेले असते अशीही माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील अनेक तरुण भंडारा,चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील मुलींमुळे फसवले गेले आहेत.तर अनेकांच्या घरी काही दिवस थांबून सोने व रोकड घेऊन पसार झाल्याच्या घटना ताज्या आहेत.आधीच लग्नाचे वय जास्त झाल्याने तरुण चिंतेत असतात आणि आर्थिकदृष्ट्या नागवले जातात ही बाब खेदजनक आहे.