मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSc Board) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास तीन टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी दहावीचा निकाल ९६.९४ टक्के एवढा होता. यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर बारावी परीक्षेप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली. राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख २९ हजार ०९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के इतका आहे. नागपूर विभाग तळात राहिला आहे. बारावीनंतर दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ एवढी असून मुलांची टक्केवारी ९२.०५ एवढी आहे.