जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अनेक वर्ष सातत्याने सेवा करून समाजाचा विश्वास संपादन करून, सर्वाना एकत्र करून एवढं मोठं काम उभारणे नक्कीच कौतुकास्पद आहे. दीपस्तंभचा मनोबल हा प्रकल्प अनेक राज्यात प्रतिकृती करण्यायोग्य प्रकल्प आहे.या दौऱ्याच्या माध्यमातून भविष्यात या सारखेच अनेक प्रकल्प भारतात कसे उभे राहतील याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू असे प्रतिपादन समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. दीपस्तंभ फाउंडेशन संचलित मनोबल प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नाशिक माधव वाघ, जात पडताळणी विभाग उपायुक्त राकेश महाजन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जळगाव विजय रायसिंग, समाज कल्याण जळगाव सहाय्यक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.
समाजातील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांचे आशेचे केंद्र म्हणजेच दीपस्तंभ मनोबलचा हा प्रकल्प आहे. दीपस्तंभ मनोबल या प्रकल्पात संपूर्ण भारताच्या विविध राज्यातील विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे, त्यामुळे हा प्रकल्प भविष्यात देशासाठी आदर्श ठरणार आहे, अशा भावना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मनोबलच्या विद्यार्थ्यांशी आस्थेवाईकपणे चौकशी करत सवांद साधला आणि मनोबलच्या नवीन वास्तूची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाशिक योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक सुंदरसिंग वसावे, समाज कल्याण अधिकारी अहमदनगर राधाकिशन देवडे, समाज कल्याण अधिकारी नाशिक देविदास कोकाटे उपस्थित होते.