जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-बहुचर्चित कलाकार गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव लावू नये, तसेच मराठा समाजाची बदनामी करू नये अन्यथा तिचा कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा शिवबा संघटनेने दिला आहे. यावरून राज्यातलं वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. या वादात मराठा समाजाने उडी घेतली आहे. गौतमी पाटीलच्या पाटील आडनावावरून वादाला तोंड फुटलं आहे. आता जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गौतमी पाटीलचं समर्थन करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच गौतमी पाटीलला इशारा देणारी संघटना म्हणजे संपूर्ण मराठा समाजाची भूमिका नाही, असे म्हणत जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवबा संघटनेला खडे बोल सुनावले आहे. पाटील हे नाव एखाद्या समाजापुरता मर्यादित नाही. गाव सांभाळणारा प्रमुख त्याला पाटील ही पदवी देण्यात आली होती. गौतमी पाटील एक चांगली कलाकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला नाव लावण्याचा अधिकार आहे. ही हुकूमशाही किंवा ठोकशाही नाही, असे करणे चुकीचे आहे, असे मराठा समाज संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. मुळात पाटील हे नाव मराठा समाजाचे आहे, असे नाही. पाटील ही पदवी आहे. मराठा समाजाचा हक्क आहे, असे नाही. बऱ्याच ओबीसी घटकांना पाटीलकी देण्यात आली आहे. पूर्वीच्या काळात पाटलांना गावगुंड दाखवत मराठी चित्रपटांमध्ये बदनाम केले जायचे. त्यावेळेस मराठा समाजाने याबाबतीत आवाज उठवणे गरजेचे होते. मराठा समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठा समाजातील शेतकऱ्यांचे विषय, मराठा समाजातील तरुणांना रोजगाराची संधी असे अनेक गंभीर विषय आहेत. पण गौतमी पाटीलसारख्या नृत्यांगणांचा विषय उचलत प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार आहे. गौतमी पाटील यांचे आडनाव पाटील असल्याने मराठा समाजाची बदनामी होत आहे, असे मला पटत नाही. गौतमी पाटील यांना धमकी देणाऱ्यांनी मराठा समाजात अनेक प्रश्न आहेत, याकडेही लक्ष घालावे, असेही सुरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. छोट्या छोट्या कारणांमुळे मराठा समाज कधीच बदनाम होऊ शकत नाही. ज्यांनी धमकी दिली आहे हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सुरेंद्र पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.