जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातील ११ वर्षीय मुलाचा पोहतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी १५ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धानवड गावाजवळील धरणात घडली आहे.या घटनेने चिंचोलीत शोककळा पसरली आहे. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. करण जयराम पवार (वय – ११) रा. चिंचोली ता. जि. जळगाव असे मृत मुलाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, करण पवार हा जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात आईवडील, भाऊ व दोन बहिणींसोबत वास्तव्याला होता. वडील जयराम सुकराम पवार हे ट्रॅक्टर चालक आहेत तर आई श्रीमती सुनिताबाई ह्या शेतात जावून मोलमजुरी करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १५ मे रोजी सकाळी आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी चारही भावंडे घरीच होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण हा गावातील मित्रांसोबत नजीकच असलेल्या धानवड गावानजीच्या धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला पाण्याचा कोणताही अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, ही बाब सोबत असलेल्या तीन मित्रांना समजली आणि गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही पोहणाऱ्या तरूणांनी पाण्यात उडी घेवून करणचा मृतदेह बाहेर काढला. खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेवून पंचनामा करण्याचे काम सुरू केले. बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याने चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात अनेकांना त्रास होऊ लागला असून दुपारी 12 ते 4 या दरम्यान घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे.