वरणगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- वरणगावचे मुख्याधिकारी नसल्याने वरणगावातील नागरिकांनी एकच आक्रोश करत संताप व्यक्त केला. वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देऊन ११ जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी आपण स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारावे असे कृती समितीच्यावतीने आधीच सांगण्यात आले होते. परंतु आज मंगळवार ११ जुलै रोजी वरणगाव शहरातून महामोर्चा नगरपरिषद येथे आल्यानंतर मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने कृती समितीचे सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी संतप्त होऊन दोन तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मुख्याधिकारी येथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा कृती समितीने घेतला. महामोर्चातील नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन एपीआय अडसूळ आणि ओ.एस सूर्यवंशी यांनी मुख्याधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली, त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी फोनद्वारे कृती समितीचे सदस्यांसोबत प्रांत यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन कृती समितीतर्फे ओ.एस.पंकज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी विविध प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या.