अमळनेर/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे विहिरीत पडलेल्या दोन हरणांना ग्रामस्थांनी बाहेर काढले आहे आणि जीवदान दिले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हरणांना नैसर्गिक अधिवासात ( जंगलात ) सोडण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील शेतकरी विलास नथ्थु पाटील यांच्या लोण पंचम शिवारातील विहिरीत दोन हरीण पडल्याची माहिती ग्रामस्थांना शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याने दिली. त्याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.त्या परिसरात त्या हरणांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.लागलीच खाटेच्या सहाय्याने दोन्ही हरणांना बाहेर काढण्यात आले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वनपाल पी.जे. सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे यांनी भेट दिली. एका हरणाला तोंडाला आणि पायाला मार लागल्याने पशू वैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील यांना बोलवून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.तोंडाला जखम झाली होती. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सबगव्हाणच्या ग्रामस्थांनी मुक्या प्राण्यांना मदत केल्यामुळे वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आभार मानले आहेत.