मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
मुंबई/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:-सध्या विविध शिक्षणात राज्य शासन आमूलाग्र बदल करत असून याचे स्वागत होत आहे. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी मध्येही आणि शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणावर बदल होतानाचे चित्र दिसत आहे.
कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज (ता. 25) राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला. कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, सहसचिव (कृषी) बाळासाहेब रासकर, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी कृषिमंत्री ,सचिव यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.
कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला. कृषीमंत्री पुढे म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते करण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. आता शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयाचे पालकांमध्ये आणि शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.