जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आदर्श जीवनाची मापदंड साने गुरूजींनी साहित्यातून आपल्यासमोर ठेवली, सर्व कलांपेक्षा जीवनकला श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन प्रा.शरद्चंद्र छापेकर यांनी केले. गुरूजींच्या साहित्यावर ते बोलत होते. अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित साप्ताहिक साहित्य चर्चेत त्यांनी विचार मांडले .`मी कसे व्हावे` कविता जी प्रार्थनासम आहे. आपण आपले दोषही ओळखले पाहिजे, असा संदेश साने गुरूजींनी या कवितेतून दिला आहे. प्रा.छापेकर यांनी ही कविता गाऊन दाखवत रसग्रहण वर्णिले. साने गुरूजींना कुठलेही लेबल लावू नये असे सांगून त्यांनी गुरूजी जळगांवला एका कुटुंबात बाळाच्या बारशानिमित्त आल्यानंतरचा प्रसंग सांगितला. बाळाला त्यांच्या पायाशी ठेवल्यावर त्यांचे उदगार ‘अरे नको, तो मोठा झाल्यावर कदाचित नेहरू, गांधीसारखा महान होईल’ ह्या बाबी अविस्मरणीय आहेत. चर्चेत सुधीर ओखदे, प्रा. सुभाष महाले, प्रा. भालचंद्र देशमुख, प्रा. पुरूषोत्तम पाटील, उषा शर्मा, सौ. कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.