जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रामानंद नगर पोलिसांनी एका महत्त्वपूर्ण कारवाईत तब्बल 36 लाख 83 हजार रुपये किमतीच्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईतून 310 ग्रॅम सोने व 250 ग्रॅम चांदी असा एकूण 33 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तपासातून दोन घरफोड्या व एक दुचाकी चोरी प्रकरण उघडकीस आल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
घटनेचा तपशील
लिलाधर शांताराम खंबायत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे साडू नरेंद्र बाध परदेशी असताना 15 मे ते 1 जून या कालावधीत मोहाडी रोड, पार्वतीबाई काळे नगर येथील घरात चोरट्यांनी प्रवेश केला होता. या दरम्यान, 357 ग्रॅम सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम चांदीचे भांडे-दागिने, 85 हजार रुपये रोख रक्कम, डीव्हीआर व वायफाय मॉडेल असा एकूण 36 लाख 83 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता.
तपास आणि अटक
गुन्हा दाखल होताच, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला. 19 सप्टेंबर रोजी रात्रीच्या गस्तीवेळी सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकाला दोन संशयित इसम आढळून आले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर आरोपी रवि प्रकाश चव्हाण (21, रा. तांबापूरा) आणि शेख शकील शेख रफीक (30, रा. रामनीगंज) यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात त्यांचे साथीदार जनंद उर्फ मस्तकीम भिकन शहा व गुरुदयालसिंग मनजित टाक यांनाही 20 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
चोरीचा मुद्देमाल जप्त
चौकशीत आरोपींनी चोरीचा माल सुरत व जामनेर येथे विकल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करून 310 ग्रॅम सोने व 250 ग्रॅम चांदी असा 33 लाख 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
रामानंद नगर पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे दोन घरफोड्या व एका दुचाकी चोरीसह तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

