मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
सावदा/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे वन्य प्राणी यांचा संचार वाढलेला दिसून येत आहे. पहाटेच्या सुमारास नर चितळ मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटना समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक ऐनपूर रस्त्यालगत नर प्रजातीतील चितळाचा मृतदेह आढळून आला . दरम्यान चितळ हा रहदारी भागात आलाच कसा? तसेच भरकटलेल्या अवस्थेत होता की इतरही चितळ होते हे समजू शकलेले नाही.
चितळ आलेच कसे याबद्दल अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास हा चितळ रहदारी भागात आल्याने कुत्र्यांनी त्याला चावा दिल्याचे ही दिसून येत आहे. तसेच चितळाची शेपूट ही नसल्याचे पाहायला मिळाले. वनविभागाला माहिती दिल्यानंतर काही वेळात वनविभागातील अधिकारी व कर्मचारी तेथे पोहचले.
रावेर वनविभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक युवराज मराठे यांनी पंचनामा केला. याप्रसंगी पाल येथील वनपाल डी. जे. रायसिंग, रावेर वनपाल रवी सोनावणे, वनपाल राजेंद्र सलदार, निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास रावेर परिक्षेत्र अधिकारी अजय बावने करीत आहेत.
मात्र खिर्डी गावात चितळ ( हरीण ) आल्याने ग्रामस्थांमध्ये विविध चर्चा सुरू झाली आहे. जंगल परिसरात पाण्याचे दुर्भिष्य असल्याने वन्य प्राणी लोकवस्तीकडे शिरकाव करीत आहेत.