जळगाव/धवल वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या पंधरवड्यात तीन-चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला तर खरं, परिणामी आता सूर्य आग ओतू लागलाय. या कारणाने जनजीवन विस्कळीत होऊ लागले असल्याचे दृश्य दिसत आहे. यंदा बदलत्या हवामानामुळे ऐन उन्हाळ्यात कडक उन्ह, मुसळधार पाऊस व गारपीट असा बदल दिसून आला. गेल्या महिन्याच्या एप्रिल महिन्यात अवकाळीच्या पावसाने थैमान घातले. तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंश सेल्सिअस पर्यंत राहिला. तर ३० पैकी नऊ दिवस पारा चाळिशी पार गेला. पण आता मे महिन्यात पुढील पंधरा दिवस तापमानाचा ४६ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळ झाली की पावसाळा
अरबी समुद्रात निर्माण झालेली दबावाची स्थिती आणि बाष्पयुक्त ढगांची निर्मिती यामुळे गेल्या एप्रिल महिन्यात गारपीट झाली. यामुळे बाजरी,मका ,केळी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे दुःख अनावर झाले आणि कंबरडे मोडले. एप्रिल महिन्यात किमान तापमान हे १९ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले तर कमाल तापमान हे ४२.४ डिग्रीपर्यंत पोहोचले. सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळ झाली की पावसाळा असे तीनही ऋतूंची अनुभूती देणारा एप्रिल महिना ठरला. उन्हाळा आहे की पावसाळा या गोंधळात लोक होते. दरम्यान, या तापमानाच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. १३ ते १७ आणि १९ ते २१ एप्रिल असे नऊ दिवस पारा चाळीशीपार गेला होता.
चक्रीवादळातून दिलासा
येत्या ७ ते ९ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत होऊ शकतो. पाऊस पडला असल्याचे आता कमालीचा उकाडा वाढला असून नागरिक ,पशु-प्राणी हैराण झाले आहेत.
असे सांगितले जाते की, जळगाव जिल्ह्यावर त्याचा परिणाम हाेणार नाही असा अंदाज आहे. ६ मे पासून सर्वत्र रखरखते ऊन पडत असून अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे.ऊन असह्य होत आहे.