सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी/प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत, अशा मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना देखील सोलापुरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पणे गोहत्या सुरूच आहेत. पोलीस प्रशासनाकडून गो हत्येवर बंदी घालणे अपेक्षित असताना उलट गोरक्षकांवरच खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. गोरक्षण, गोसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा संघटनांची विविध प्रयत्नातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचे षडयंत्र जिहादी वृत्तीच्या लोकांकडून रचले जात आहे.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, गोवंशाची कत्तल करणारे कत्तलखाने त्वरित उध्वस्त करुन भुईसपाट करावेत, गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करणे थांबवावे, शहर आणि ग्रामीण स्तरावर प्रत्येक पोलीस चौकीमध्ये काऊस्कोडची नेमणूक करावी, गोरक्षकांना पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावे, गाईला राष्ट्रीय पशु घोषित करावे, संपूर्ण भारतभर होत असलेल्या साधुसंतांवरील जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम गोमांस विक्री केली जाते. त्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाने कार्यशाळांचे आयोजन करावे, सोलापूर शहरात भाकड गोवंशांसाठी सरकारी गोशाळा त्वरित स्थापन करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पोलीस आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक गोरक्षकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. यात गोरक्षकांच्या प्राणांची आहुती दिली जात आहे. हे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले.
याप्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, विलास शहा, महेश भंडारी, केतन शहा, नरेंद्र काळे, जय साळुंखे, अंबादास गोरंटला, बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, सिद्राम चरकूपल्ली, बजरंग दलाचे शहर संयोजक नागेश बंडी, विश्व हिंदू परिषदेचे सेवा विभाग प्रमुख शीतलकुमार परदेशी, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक रवी बोल्ली,जयदेव सुरवसे,प्रमोद येलगेटी,सतीश सिरसिल्ला,योगीराज जडगोनार, अविनाश कैय्यावाले आदी सहभागी झाले होते.