जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- कृषीकन्या कवयित्रीबहिणाबाई चौधरी पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मधून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच पुतळाही उभारण्यात येणार आहे.
अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली. कवयित्री बहिणाबाई यांच्या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता.लवकरच पुतळा साकारला जाणार आहे. जी-२० संमेलनाच्या रूपाने तरूणांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. देशाला शिखरावर पोहचविण्याचे काम तरूणच करू शकतात, अशी आशाही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित ‘जी-२० युवा संवाद – भारत @२०४७ संमेलना’चे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास, पंचायतराज आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक डी. कार्तिगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.