नागपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्याच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीस चालना देणाऱ्या जागतिक बँक सहाय्यित ‘MahaSTRIDE’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आला.या उपक्रमांतर्गत राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये विकास आराखडे तयार करण्यात येत असून, यासाठी नुकतीच एक कार्यशाळा नागपूर येथे पार पडली. या कार्यशाळेमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी दूरदृष्टीपूर्ण आणि आकडेवारीवर आधारित सादरीकरण केले. त्यांच्या मते, जळगाव जिल्हा आता अर्थविकासाच्या नव्या टप्प्यावर आहे.
जिल्हा सकल उत्पादन (GSDP) 1.5% वरून थेट 2.5% पर्यंत वाढविण्याचे ठोस उद्दिष्ट या उपक्रमाअंतर्गत ठेवण्यात आले आहे. या वाढीमुळे जिल्ह्यातील रोजगारनिर्मिती, औद्योगिक गुंतवणूक आणि एकूण जीवनमानात सकारात्मक बदल अपेक्षित आहे. ‘MahaSTRIDE’ उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्याला केवळ संख्यात्मक नव्हे, तर गुणवत्तेच्या प्रगतीकडे घेऊन जाणारी संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या अर्थव्यवस्थेचा व्यापक विचार करून स्थानिक गरजांनुसार आराखडे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
“महाराष्ट्राच्या प्रगतीत जळगाव जिल्ह्याचा ठसा अधिक ठळक व्हावा, हाच आमचा उद्देश आहे,” असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी सांगितले.