प्रशासनामार्फत समूपदेशनासाठी या टोल फ्री क्रमांकाचे लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल हरी विठ्ठल नगर रेल्वे ट्रॅक परिसरात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. आत्महत्येसाठी संशयास्पद व्यक्ती रेल्वे ट्रॅकललगतच्या परिसरात वावरतांना आढळून आल्यास ही घटना रोखण्यासाठी तात्काळ प्रशासनाकडे संपर्क साधावा. असे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हरी विठ्ठल नगर परिसरातील रेल्वे ट्रॅकच्या ठिकाणाची काल पाहणी केली, त्यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून आत्महत्यांच्या घटनांबद्दल चर्चा केली. शहरात मागील काही दिवसांपासून हरि विठ्ठल नगर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. या विषयाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व आत्महत्यांपासून लोकांना परावृत्त करावे, यासाठी नागरिकांनी आत्महत्या करणेसाठी संशयास्पद व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्यास ही अप्रिय घटना रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याचे नागरिकांना आवाहन केले. तसेच नागरी सुविधांबद्दल चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली. या बाबतच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.
प्रशासनामार्फत समूपदेशनासाठी दिलेला टोल फ्री क्रमांक १४४१६
समाजातील आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेत बदल व्हावा, आत्महत्येचा, नैराश्याचा विचार त्याच्या डोक्यात येवू नये,व आत्महत्या घडू नये यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा रूग्णालयाच्या वतीने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत टेलिमानस टोल फ्री १४४१६ हेल्पलाईन क्रमांकाची जनजागृती करण्यात आली. या क्रमांकावर कोणीही संपर्क साधल्यास त्या व्यक्तीस समूपदेशन केले जाणार आहे. या टोल फ्री क्रमांकाचे लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्याच हस्ते रेल्वे क्रॉसिंग व ट्रॅकलगत खाबांवर बोर्ड लावण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री. प्रवीण महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील उपस्थित होते.