Monday, September 16, 2024
police dakshta logo
Homeजळगावअ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हात खान्देशचे प्रतिबिंब, बहिणाबाईंचे जातं-लेखणी, संबळ अन् केळीची पानं...!

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हात खान्देशचे प्रतिबिंब, बहिणाबाईंचे जातं-लेखणी, संबळ अन् केळीची पानं…!

जळगाव / तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-जळगाव जिल्ह्याला एक वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभली आहे.तब्बल ७२ वर्षांनंतर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तसेच प.पू. साने गुरुजी आणि संत सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे. आज संमेलनाच्या बोधचिन्हाचे उत्साहात अनावरण करण्यात आले.

या संमेलनाच्या माध्यमातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ठरेल,” असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केला. पुढच्या पिढीला आदर्श ठरेल असं देणं म्हणून हे संमेलन यशस्वीरित्या आपल्या सर्वांना पार पाडायचं आहे, असंही त्यांनी सांगितले.

अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात ना. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलिंद भामरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथे होत आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, बोधचिन्हाची निर्मिती येथील भूमीपुत्राने केली याचा माझ्यासारख्या भूमीपुत्राला अभिमान आहे. अतिशय उत्कृष्ट आणि अर्थबोध बोधचिन्ह तयार केले. बोधचिन्हाच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर खान्देशची प्रतिमा उमटवली आहे. बोधचिन्ह जगात नावलौकिक करेल अशी प्रत्येक गोष्ट घेतली आहे. अमळनेर सारख्या छोट्या गावात १९५२ साली साहित्य संमेलन झाले. प्रताप कॉलेज, प्रताप शेटजींनी पूर्वजांनी तत्वज्ञान मंदिराच्या माध्यमातून जगात प्रसिद्ध आहे. सानेगुरुजींची चळवळ येथून झाली, याचा सर्व अभ्यास करून येथे साहित्य संमेलनसाठी परवानगी दिली.

मातृभाषा हीच शिक्षणाची भाषा असल्यास प्रगती: कुलगुरु

बोधचिन्हाचे उद्घाटक कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी म्हणाले की, तब्बल ७२ वर्षानंतर अमळनेर येथे होणारे साहित्य संमेलन आत्मीयतेचा विषय आहे. अमळनेर सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित आहे. संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, सानेगुरुजी कर्मभूमी, दानशूर व्यक्तिमत्व प्रताप शेठ व विप्रो समुहाचे संस्थापक अजीम प्रेमजी यांची उद्योगभूमी आहे. शाळेची पायरी देखील न चढणाऱ्या कवयित्री बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला दिले ही जगातली अद्भुत घटना आहे.
कृषीकन्या बहिणाबाईंनी आपल्या कवितांमधून जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे. मातृभाषेतून शिक्षण परिपक्व करते. मातृभाषेचे खूप महत्त्व आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पाच अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध केले आहेत. मराठी साहित्य संमेलन खास असणार असून खान्देशसाठी अभिमानाची बाब आहे. शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेचा अपेक्षित वापर होत नाही, यासाठी आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे. मातृभाषा हीच शिक्षणाची भाषा असेल तर विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द होते, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला असल्याचेही कुलगुरुंनी नमूद केले.
खान्देशातील अमळनेर या सांस्कृतिक वैभव लाभलेल्या शहरात मराठी साहित्य संमेलन होत असल्याने साहित्य, अभ्यासक व कलाप्रेमी वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

असे आहे साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह

बोधचिन्हात लेखणी, केळीची पानं, मराठीचा म, बहिणाबाईंचा जातं, ग्रामीण भागाचं वाद्य संबळ, आदिवासी वाद्य तरपा, माता सरस्वतीचे बोधचिन्ह, सखाराम महाराज मंदिर, मंगळग्रह मंदिराच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिन्हाखाली ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ या ओळी लिहिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या