अमळनेर /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेत शिवार कोरडे तर शेतकऱ्यांचे डोळे ओले झाले आहेत. अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करून शासनाने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी अमळनेर तालुका शिवसेना (उबाठा) तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिके कोमजून लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे गेले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसानापोटी अनुदान देण्यात यावे.तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल म्हणून शासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, विजय पाटील, प्रताप शिंपी, रवींद्र पाटील आदींनी केली आहे.