चोपडा /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- ‘जे समाजाचे हित पाहते ते साहित्य, ही संत विनोबाजींची साहित्याची व्याख्या पूर्णपणे प्रत्ययकारी आहे. साहित्य समाजात स्नेह, वात्सल्य निर्माण करते. अमळनेरात होऊ घातलेले साहित्य संमेलन हे खान्देशसाठी मोठी पर्वणी आहे. हे संमेलन फक्त अमळनेरचे नसून खान्देशचे आहे. या संमेलनात सर्वांनी तन-मन आणि धन देत सहभागी होऊन हे संमेलन यशस्वी करावे, ‘ असे आवाहन माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले.
अमळनेर येथे फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर माजी विधान सभाध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, अमळनेरच्या मराठी वाडःमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष कवी रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, म.सा.प.चे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, कार्याध्यक्ष विलास पाटील, कार्यवाह संजय बारी, नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी. कुळकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, अ.भा.सा.प.चे अध्यक्ष अशोक सोमाणी, सचिव प्रभाकर महाजन, रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटिया उपस्थित होते.

