चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चाळीसगाव तालुक्यातील खराडी शिवारात बकऱ्या चोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली.
ही घटना 19 मे रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. शिंदी येथील शेतकरी नारायण तिकांडे यांच्या शेताजवळील घराबाहेर बांधलेल्या बकऱ्या तीन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. बकऱ्यांचा आवाज ऐकून तिकांडे यांनी पाठलाग केला असता, चोरटे बकऱ्यांनी भरलेली गाडी (ग्रे रंगाची युंडाई सँट्रो, क्र. MH01NA558) जागेवरच सोडून पळाले. या गाडीत एकूण आठ बकऱ्या सापडल्या.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
या आरोपींबाबत अधिक तपास केला असता आरोपी शांतराम उर्फ जिभ्या सुकलाल गायकवाड (२९), रा. पिंपरखेड, ता. भडगाव, अमोल महादू मालचे (२२), रा. यशवंतनगर, भडगाव आणि सुनील बापू देवरे ऊर्फ भील (२३), रा. लोणी सीम, ता. पारोळा यांना अटक करण्यात आली. या तिघांनी चाळीसगावसह जळगाव, धुळे, मालेगाव, नंदुरबार आणि संभाजीनगर परिसरातही अशा चोरीच्या घटना केल्याचे कबूल केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक भगवान माळी करीत आहेत.