जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढलेली दिसत असून, मागील दोन ते तीन दिवसांपासून विविध भागांत अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. जळगाव जिल्ह्यातदेखील गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले.
हवामान विभागाकडून दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर वारे प्रतितास ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, शेतकरी व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत (२९ व ३० ऑगस्ट) तुरळक ते हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र, ३१ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन वातावरणात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. १ ते ६ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील तापमान दोन ते तीन अंशांनी वाढून उकाडा जाणवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

