नवी दिल्ली | वृत्तसेवा :- जळगाव विमानतळाच्या सुधारित पायाभूत सुविधांच्या कामाला मार्च २०२६ पासून सुरुवात होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामुळे जळगाव व परिसरातील विमानसेवा अधिक सक्षम होण्यास मोठी चालना मिळणार आहे.केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या बैठकीत जळगाव–मुंबई विमानसेवेची वारंवारिता वाढवण्याची तातडीची गरज तसेच जयपूर व बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांशी थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रादेशिक विमानसेवा अधिक सक्षम करून प्रवासी सुविधा सुधारण्यासह विभागीय विकासाला चालना देण्यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. प्रस्तावित पायाभूत सुविधा सुधारणा पूर्ण झाल्यानंतर जळगाव विमानतळाची क्षमता वाढून प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

