जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-
“आला सास..गेला सास..जीवा तुझं रे तंतर..”
‘अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर ‘..!!
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..!!”
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मीयते भाकर.”.!!
अश्या कमीत कमी शब्दांच्या कविता..त्यांच्या कवितेतील शब्द अर्थाची उंची गाठणारे..जीवन जगण्याचं तत्वज्ञान साध्या व सोप्या भाषेततून, आपल्या लेवा गणबोलीतून मांडणाऱ्या खान्देशच्या निसर्गकन्या , कृषिकन्या महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज महापालिकेच्या कवयित्री बहिणाबाई उद्यानात सकाळी नऊ वाजता एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. पुण्यतिथी दिन हा ” विश्व लेवा गणबोली दिन ” म्हणून आज सर्वत्र साजरा करण्यात आला.
प्रारंभी कलावंत व कवी तथा लेवा गणबोली साहित्य मंडळाचे संस्थापक सचिव तुषार वाघुळदे आणि साहित्यप्रेमी नरेंद्र शिवदे यांनी बहिणाबाईंच्या पुतळ्याची स्वच्छता केली.पाण्याचा मारा करून पुतळा धुऊन स्वच्छ केला. पूर्ण पुतळा व चौथरा परिसर चकाचक केला. श्री.वाघुळदे व कवयित्री बहिणाबाईंच्या साहित्यावर प्रेम करणारे जळगाव महापालिकेचे शाखा अभियंता समीर बोरोले यांच्या शुभहस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित सर्वांनी बहिणाबाई यांची गाजलेली ” अरे संसार संसार “…..!! ही कविता सामुदायिक स्वरूपात कविता सादर केली.याप्रसंगी मंडळाचे संचालक संजय चंद्रभानू पाटील, संतोष जोशी,सुरेश कोल्हे,नेहा वाघुळदे,रश्मी पाटील, जितेंद्र धनगर, प्रज्वल भोई , राहुल गरुड, शुभांगी पाटील, शुभम पाटील आदींची आवर्जून उपस्थिती होती.
‘ कवयित्री बहिणाबाईंनी अगदी साध्या सोप्या भाषेत आपल्या काव्यांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान जगाला सांगितले, बहिणाबाई यांचे काव्य सातासमुद्रापार पोहचले ‘ असल्याचे गौरवोद्गार तुषार वाघुळदे यांनी काढले.अभियंता व साहित्य प्रेमी समीर बोरोले यांनी उपस्थित साहित्यिक व अभ्यासक यांना सोबत घेऊन बहिणाबाई उद्यानात तीनही पुतळे तसेच फाऊंटन परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.संपूर्ण उद्यानाची पाहणी करण्यात आली. आणि सकाळपासून तर सायंकाळपर्यन्त कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची गाणी सातत्याने सुरू राहणार असल्याबद्दलची लवकरच छान व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले..याबद्दल डॉ.अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे आणि संजय पाटील यांनी अभियंता श्री.बोरोले यांचे कौतुक करून अभिनंदन केले व या कामी ज्या ज्या प्रकारचे सहकार्य लागेल ते मंडळातर्फे आम्ही करू असे वचन दिले.कार्यक्रमास साहित्यिक, अभ्यासक साहित्य प्रेमी उपस्थित होते.