३० एप्रिलपर्यंतच त्रुटी दुरुस्तीची मुदत; मध्यस्थांची गरज नाही, महिलांना मोबाईलवरूनच EKYC करण्याचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.या योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया सध्या बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, ईकेवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. लाभार्थी महिला स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच, आवश्यक असल्यास जवळील अंगणवाडी सेविकांची मदतही घेता येणार आहे.फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती, कागदपत्रे किंवा आर्थिक व्यवहार देऊ नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. शासनाकडून अधिकृत माध्यमांतूनच माहिती घेऊन सुरक्षितपणे प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

