जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., एम.आय.डी.सी. जळगाव येथील एलपीजी रिफिलिंग प्लांटमध्ये नोंदणीकृत माथाडी कामगारांना ३ डिसेंबरपासून प्रवेश व काम नाकारल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (८ डिसेंबर २०२५) तातडीची व महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. उत्तर महाराष्ट्र माथाडी इतर श्रमजीवी असंरक्षित व असंघटीत कामगार संघटनेने संबंधित कामगारांना प्लांटमध्ये येण्यास मज्जाव केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.बैठकीत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत जिल्हाधिकारी यांनी कठोर भूमिकेत स्पष्ट निर्देश दिले की, “निवडणूक दिवशी मतदानासाठी सुट्टी घेतल्याच्या कारणावरून कोणत्याही नोंदणीकृत माथाडी कामगाराला कामावरून दूर ठेवणे अनुचित आहे. सर्व कामगारांना उद्याच्या सकाळच्या शिफ्टपासून तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे.”
जिल्हाधिकारी यांनी पुढे नमूद केले की, कामगारांचे कायदेशीर हक्क बाधित होऊ नयेत, कायदा व सुव्यवस्था राखली जावी आणि औद्योगिक कामकाज नियमितपणे सुरू राहावे, यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने व समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे.या बैठकीस पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, सहाय्यक कामगार आयुक्त व अध्यक्ष – माथाडी मंडळ, जळगाव; बीपीसीएल व एचपीसीएलचे प्लांट व्यवस्थापक, सर्व वाहतूक ठेकेदार/ट्रान्सपोर्टर/डिलर्स तसेच उत्तर महाराष्ट्र माथाडी संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले.कामगार हिताचे संरक्षण व उद्योगांच्या सुचारू कार्यप्रणालीमध्ये संतुलन ठेवत रचनात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला असून, सर्व पक्षांमध्ये समन्वय साधण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने राबवली जात आहे.

