नशिराबादला अपक्षांची आघाडी स्थापन ; नगराध्यक्ष पदासह 20 जागा लढणार..!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नशिराबादमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून समीकरणे अक्षरशः बदलताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत परस्परांविरोधात टीकेची तोफ डागणारे नेते आता एकाच व्यासपीठावर येण्यास सज्ज झाले आहेत. उमेदवारी, पक्षांतर्गत नाराजी आणि सत्ता मिळवण्याची धडपड यामुळे स्थानिक राजकारणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे.
विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबादमध्ये अपक्ष उमेदवारांनी “अपक्ष आघाडी” स्थापन केली असून नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या अंदाजे २० जागांवर दमदार लढत देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. ही आघाडी विविध राजकीय पक्षातील नाराज, बंडखोर तसेच स्वयंभू अपक्ष उमेदवारांना एकत्र आणून स्वतंत्र ताकद सिद्ध करण्याच्या तयारीत आहे.दरम्यान, दुसऱ्या बाजूला महायुती (भाजप–शिंदे सेना) अंतर्गत समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी तिकिटांचे वाटप, जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जाणे, आणि निर्णय प्रक्रिया बंद खोलीत होत असल्याच्या आरोपांमुळे नाराज पदाधिकारी बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. या नाराज नेत्यांपैकी काहीजण अपक्ष आघाडीसोबत एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आहे.
इतक्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट देखील मैदानात उतरला असून स्वतंत्र संघटनात्मक पद्धतीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवित आहे. त्यामुळे नशिराबादमधील निवडणुकीचे चित्र बदलत असून मतदारांसमोर चार प्रमुख ताकदी उभ्या राहणार आहेत यात महायुती, अपक्ष आघाडी, शिवसेना ठाकरे गट, AIMIM.
आता अपक्षांची ही आघाडी स्थापन झाल्यानंतर, “महायुती विरुद्ध अपक्ष” अशी थेट लढत अपेक्षित होती. परंतु ठाकरे गटाच्या सक्रियतेमुळे आणि AIMIM च्या वाढत्या सक्रियतेमुळे आता त्रिकोणी नव्हे तर संभाव्य बहुकोनी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.राजकीय हालचालींमध्ये अजूनही गाठीभेटी, चर्चा आणि फोनवरून सुरू असलेल्या वाटाघाटी यामागे नाराजी आणि भोवताली वाढलेली अस्वस्थता प्रकर्षाने जाणवत आहे. नामनिर्देशनासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना, कोण कोणासोबत राहणार आणि कोण कोणाविरोधात लढणार याबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे.
नशिराबादमध्ये पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीला “अपक्ष आघाडी विरुद्ध महायुती, ठाकरे गट, AIMIM” असा रंग, तर मतदार म्हणतात… “विकास करा…आता राजकारण पुरे झाले!”
निवडणुकीचा ताप वाढत असताना, शहरातील प्रत्येक गल्लीबोळात चर्चांनी जोर धरला आहे. अंतिम उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच नशिराबादचा खरा राजकीय चित्रपट उलगडणार आहे.

