नशिराबाद │प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार माघारीसाठी आज, 21 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं उमेदवारांमध्ये वाटाघाटी, समन्वय, विनवण्या, आश्वासने आणि पायघड्या घालण्याचा फेर पुन्हा एकदा सुरू असून संपूर्ण नशिराबादमध्ये राजकीय तापमान कमालीचे चढले आहे.आजचा दिवस निर्णायक मानला जात असून माघारीनंतरच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या अंतिम लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
नशिराबाद नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी एकूण 15 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 5 अर्ज अवैध घोषित झाल्यानं 10 उमेदवार रिंगणात उरले होते. आज माघारीनंतरची अंतिम यादी जाहीर होताच नगराध्यक्ष पदाची खरी लढत कोणाकोणात होणार हे निश्चित होईल.दरम्यान, नशिराबाद नगरपरिषद मध्ये नगरसेवक पदासाठी एकूण 144 अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्ज छाननीत 30 अर्ज बाद झाल्यानं एकूण 114 अर्ज वैध ठरले तर 30 अर्ज अवैध ठरले. गेल्या दोन दिवसांपासून माघारीचे सत्र सुरू असून आतापर्यंत 8 उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेतले आहे. आज दुपारपर्यंत अजून किती उमेदवार माघार घेतात, यावरून नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत पुढील राजकीय घडामोडींना दिशा मिळणार आहे.
यावेळी पक्षीय नाराजी, पक्षाचा अपक्ष उमेदवारांना छुपा पाठिंबा, अंतर्गत बंडखोरी आणि गटबाजीचे परिणाम स्पष्टपणे जाणवत असून अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे. ही वाढलेली अपक्ष उमेदवारी पक्षनिहाय समीकरणांना धोक्याची ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

