मुंबई / पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- राज्यातील विविध जिल्ह्यांत ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आज कमी दाबाचा एक पट्टा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत पुढे सरकला असल्याने पुढील ७२ तासांमध्ये राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे..
याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आज विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून हाच पाऊस पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

