मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान’ राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित संस्था व संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी व सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) यांच्या मार्गदर्शनानुसार या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रे, नेत्र तपासणी शिबिरे तसेच विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून सुरक्षित वाहनचालना बाबत जनतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

