रस्त्यावर संध्याकाळी होणारी वाहतूक कोंडी ; नियमभंगावर कठोर कारवाईची अपेक्षा.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरातील मुख्य मार्गावर हॉटेल सावन परिसरात हॉटेलसमोरील service road रस्त्यावर होत असलेल्या अनियमित वाहन पार्किंगमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज सायंकाळपासून उशिरापर्यंत रस्त्याच्या कडेला आणि काही वेळा थेट मार्गावर उभ्या केल्या जाणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. हा service road मार्ग नशिराबाद–जळगाव दरम्यान अत्यंत वर्दळीचा असून दुचाकी, खासगी वाहने तसेच अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. रस्त्याची रुंदी मर्यादित असताना वाहनांचे अनियमित पार्किंग होत असल्याने अचानक ब्रेक मारणे, चुकीच्या दिशेने वळावे लागणे किंवा वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढल्याचे वाहनचालक सांगत आहेत.
प्रशासनावर दुहेरी निकषांचे आरोप…
स्थानिक नागरिकांच्या मते, छोट्या नियमभंगावर त्वरित कारवाई करणाऱ्या यंत्रणा, मात्र मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या पार्किंग प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
रात्री परिस्थिती अधिक धोकादायक…
रात्री उशिरा कामावरून परतणारे कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिक यांना या भागातून जाताना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रकाश व्यवस्था अपुरी असताना रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे अचानक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नागरिकांच्या प्रमुख मागण्या…
रस्त्यावर होणारे अनधिकृत पार्किंग तात्काळ हटविणे. - व्यावसायिक आस्थापनांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था सक्तीने उपलब्ध करण्याचे निर्देश.
- सायंकाळ व रात्री वाहतूक नियंत्रणासाठी नियमित पोलिस गस्त.
- नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई.
संबंधित विभागांनी घ्यावी तातडीची दखल…
या संदर्भात jalgaon Police, स्थानिक वाहतूक शाखा, नशिराबाद पोलीस स्टेशन, तसेच जळगाव संबंधित जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही नागरिकांचा मूलभूत हक्क असून, कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागांनी ठोस व प्रभावी पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

