मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– इंदूर ते हैदराबाद महामार्ग प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाला आ. चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यांच्या या आंदोलनावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारमध्ये त्यांच्या पततेवरच शंका व्यक्त केली आहे.
खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला न मिळाल्याने आंदोलन उभे राहिले. आमदार चंद्रकांत पाटीलही यामध्ये सहभागी झाले. हे आंदोलन चिघळल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांसह पाटील यांना ताब्यात घेऊन नंतर भुसावळ येथे सोडून दिले. त्यानंतर मुक्ताईनगर बंद पाळण्यात आला.या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वच प्रयत्न करणे आवश्यक आहे, मात्र सत्ताधारी आमदार असूनही आंदोलनाची वेळ येते याचा अर्थ त्यांची शासन दरबारी पत नाही का?”
खडसेंनी असेही नमूद केले की, पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडायला हवा होता किंवा आपल्या नेत्यांकडे पाठपुरावा करणे आवश्यक होते. केवळ रस्त्यावर उतरून प्रश्न सुटत नाहीत. तांत्रिक अडचणी आहेत, याबाबत महसूल मंत्र्यांशी आपण चर्चा केली असून शेतकऱ्यांच्या सोबत आपणही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.