दिखावेपणा आणि अमिषाला बळी न पडता मातापित्यांच्या संमतीनेच मुलींनी विवाह करावा-पंडित प्रदीप मिश्रा..
सनातन धर्माला जागृत ठेवण्यासाठी श्रेष्ठ कार्य करावे
जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- सनातन धर्म संस्कृती सर्वोत्तम असून त्यानुसार मुलींनी मातापित्यांच्या संमतीनेच विवाह करावा आणि कन्यादानाची संधी पित्याला द्यावी, असे कळकळीचे आवाहन आंतरराष्ट्रीय किर्तीचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी आज येथे केले.दिखाऊपणा आणि कोणत्याही आमिषाला मुलींनी बळी पडू नये, तसेच भावनेच्या भरात वाहवत जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला. शिवमहापुराण कथेचा आज समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अफाट जनसमुदायाची उपस्थिती आज समारोपाच्या कथेला होती.
पंडित मिश्रा म्हणाले की, सनातन धर्म जिवंत आणि जागृत ठेवण्यासाठी सर्वोत्तम कार्य प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. धर्मासाठी श्रेष्ठ कर्म केल्यास मृत्यूनंतर देखील नाव कायम राहते. ‘प्यार वाली शादी मत करना, जिम्मेदार वाली शादी करना…’असे त्यांनी मुलींना सांगितले. ‘प्यार वाली शादी’ टिकत नाही तर ‘जिम्मेदार वाली शादीच’ टिकून राहते. चित्रपटांमुळे संस्कृतीवर आघात झाला असून नुकसानच झालेले आहे. चित्रपटातून वास्तविकता दाखवली जात नाही, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
खरा ‘पारखी’ भक्तच
भगवान शंकराला ओळखणे अतिशय कठीण असल्याचे सांगून ते म्हणाले की, त्यासाठी खरा ‘पारखी’ भक्तच असावा लागतो. परमेश्वर प्राप्तीसाठी कलियुगामध्ये फक्त नामस्मरण पुरेसे आहे. जन्म, मृत्यू आणि पालनपोषण या तीन गोष्टी भगवान शंकराने आपल्याकडे ठेवलेल्या आहेत.भगवान शंकराच्या भक्तांचे कुणीही वाईट करू शकत नाही. देशभरात भगवान शंकराच्या मंदिरांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. मात्र मंदिरांमध्ये गर्दी कायम राहिली पाहिजे. भजन, कीर्तन वाढले पाहिजे. याचबरोबर देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
कथा सांगणाऱ्यापेक्षा कथा ऐकणारा श्रेष्ठ
कथा सांगणाऱ्यापेक्षा कथा ऐकणारा श्रेष्ठ असतो. कथा ऐकणाऱ्याला कथेचा खरा आनंद घेता येतो. पूर्वीच्या काळी एकमेकांकडे जाणे-येणे असायचे. पूर्वी दिखावा नव्हता असे सांगून ते म्हणाले की, आता घर आणि बंगले मोठे होत असून माणसातील संबंध संपुष्टात आलेले आहेत. कुणाकडे जाण्याची फारशी इच्छा होत नाही किंवा कोणाकडे कोणी जाऊन राहत नाही. अलीकडच्या काळात दिखावा वाढलेला असून प्रेमाचा विषय संपलेला आहे. कोणाकडेही जायचे असल्यास घर आणि बंगला पाहून अजिबात जाऊ नये. ज्याचे हृदय आणि मन विशाल आहे, अशांशी संबंध ठेवले पाहिजेत.दानधर्म, अन्नदान करताना त्याचा अहंकार करू नये. कारण अहंकार भगवान शंकराला आवडत नाही. आपले प्रश्न भगवान शंकराला सांगावे. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. कठीण परिस्थितीमध्ये तो नक्कीच मदतीला धावून येतो, यात शंका नाही.
रोगमुक्तीसाठी कुंदकेश्वर महादेवाचे महत्व…
पंडित मिश्रा यांनी आज कुंदकेश्वर महादेवाचे महत्त्व सांगितले. कितीही मोठा आजार असेल आणि औषध काम करत नसेल अशावेळी कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून औषध घ्यावे म्हणजे औषध परिणामकारक काम करू लागते, असे ते म्हणाले.