Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजेष्ठ राजकारणी, सामाजिक, शैक्षणिक, व कामगार क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व ..विजयबापू कोल्हे काळाच्या...

जेष्ठ राजकारणी, सामाजिक, शैक्षणिक, व कामगार क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व ..विजयबापू कोल्हे काळाच्या पडद्याआड..!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जेष्ठ राजकारणी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि कामगार क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तीमत्व म्हणून लौकीक असणारे माजी ज्येष्ठ नगरसेवक विजयबापू पंडितराव कोल्हे यांचा आज निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव शहराचा इतिहास ज्या घराण्याच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, त्या कोल्हे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य विजयबापू पंडितराव कोल्हे यांनी आज रात्री शेवटचा श्‍वास घेतला. स्वातंत्र्यसैनिक पंडितराव कोल्हे यांचे चिरंजीव असणार्‍या विजयबापूंनी त्यांचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे चालविला. ऐशीच्या दशकात तत्कालीन जळगाव नगरपालिकेपासून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार्‍या विजयबापूंनी सातत्याने जवळपास ३५ ते ४० वर्षे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा सिंधूताई कोल्हे यांना नगराध्यक्षपद तर चिरंजीव ललित कोल्हे यांना महापौरपदाची संधी देखील मिळाली.

जळगावच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणार्‍या रेमंडमधील कामगार युनियनवर देखील जवळपास ३० वर्षे त्यांचे वर्चस्व होते. या कालावधीत त्यांनी कामगार कल्याणाच्या अनेक योजना आखल्या. तर आपले बंधू कामगार नेते कै. दिलीपअण्णा यांच्या मदतीने लेवा पाटीदार समाजातील सामुदायिक विवाह सोहळ्यासह अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग होता. तर, कालिका माता मंदिर रस्त्यावरील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव काम केले.अनेक गरजूंना त्यांनी सढळ हाताने मदत केली असून अनेकांना नोकरी दिली आहे.स्वभावाने जितके मृदू ,हसरे तितकेच ते कठोरही होते.

आज रात्री अल्पशा आजाराने विजयबापू कोल्हे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि.6 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता अंत्यंस्कार करण्यात येणार आहे. कोल्हे नगर येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल.ते माजी महापौर ललितभाऊ कोल्हे यांचे वडील तर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरीताताई माळी-कोल्हे यांचे सासरे होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी दुःखद घटना असून त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना पोलीस दक्षता लाईव्ह टीमच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या