जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये १५ व १६ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले असून बाधित नागरिकांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “प्रशासन तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे. प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नदी-नाल्याजवळ जाणे टाळावे, गुरेढोरे व शेतीसाहित्य सुरक्षित स्थळी हलवावे आणि प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा.” जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष यांच्या आदेशानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथील ३५ अधिकारी व जवानांचे दोन पथक मागवण्यात आले असून एक पथक जामनेर, तर दुसरे पथक पाचोरा येथे रवाना करण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील हानी:
नेरी, वाकडी, शेंदुर्णी व तोंडापूर या गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. नेरी बु. येथे २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५ ते २० घरे व ५ दुकानांत पाणी साचले असून एक कुटुंब शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. माळपिंप्री येथे पिकांचे नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व बु. गावांचा संपर्क तुटला आहे.
पाचोरा तालुक्यातील परिस्थिती:
पिंपळगाव व बरखेडी मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शिंदाड, गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे व वाणेगाव या गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आल्याने साधारणतः ३५० ते ४०० कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. शिंदाड येथे तब्बल ४०० जनावरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील हानी:
कुन्हा व जोधनखेडा गावांमध्ये घरांत पाणी शिरले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे (वय २८) हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. बाधितांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
नशिराबाद सुनसगाव पुलावरून पाणी ; वाहतूक भुसावळ मार्गे वळवली.