भुसावळ| प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील कंडारी शिवारात रविवारी दि.५ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या धक्कादायक घटनेत जळगाव येथील तरुणाचा मित्रांसोबत झालेल्या किरकोळ वादातून खून करण्यात आला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारे जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०) हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी ते जळगाव येथील तीन मित्रांसह भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात कामानिमित्त गेले होते. रात्रीच्या सुमारास चौघे एका हॉटेलमध्ये मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद पुढे तीव्र स्वरूप धारण करताच तिघांनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत जितेंद्र याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ व रुग्णालय गाठले. जितेंद्र साळुंखे यांचा मृतदेह पुढील तपासासाठी भुसावळ येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
या प्रकरणात संशयित आरोपींपैकी एक हा माजी महापौराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.