जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ या अमर देशभक्तीपर गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे ७ नोव्हेंबर रोजी कालिंका माता मंदिर चौकात देशभक्तीपर गीतांचा भव्य व स्फूर्तीदायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुबोनियो परिवाराच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी सुरू झालेल्या या मैफिलीत तुषार वाघुळदे प्रेझेंट्स सुप्रसिद्ध 7 स्ट्रिंग्स ऑर्केस्ट्राच्या कलाकारांनी देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारून टाकले. गायक नारायणभाई ओझा, नवगायिका दीक्षा, तुषार वाघुळदे आणि निलेश पाटील यांनी सादर केलेल्या गीतांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. उपस्थित रसिकांनी कलावंतांचे उभे राहून कौतुक केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेची प्रतिमा पूजून राष्ट्रगीताला अभिवादन करण्यात आले. पूजन सोहळा आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे आणि उद्योगपती व पर्यावरण प्रेमी सुबोध कुमार चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला. परिसरात आकर्षक रांगोळ्यांनी देशभक्तीचा भाव आणखी खुलवला.
या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ हे गीत सामूहिकरीत्या सर्वांनी गायले. त्यानंतर ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया’, ‘मेरे देश की धरती’, ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘कर चले हम फिदा’, ‘मां तुझे सलाम’ आदी अनेक देशभक्तीपर गीतांनी उपस्थित नागरिकांची मने जिंकली.‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘आनंदमठ’ कादंबरीत लिहिले असून १९५० मध्ये ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. स्वातंत्र्य संग्रामात या गीताने लोकांच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य आग पेटवली होती. राष्ट्रगीताच्या दीडशे वर्षपूर्ती निमित्त देशभर जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाला बंटी भारंबे, दिनेश अत्तरदे, चिराग काळे, प्रदीप रोटे, विरें खडके, महेश चौधरी, मिलिंद चौधरी यांसह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दमदार आवाज व प्रभावी निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलावंत तुषार वाघुळदे यांनी केले.

