नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील पेठ परिसरात दुचाकी जाळल्याची आणखी एक घटना समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पेठ भागातील रहिवासी सिताराम बुधा नाथ यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक (एम एच 19 डीयू ३४९९) ९ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळात या भागात अशा प्रकारची ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वीही पेठ परिसरातील ज्ञानेश्वर नाथ आणि नारायण धनगर यांच्या दुचाकीला अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात असून अजूनही आरोपींचा शोध लागलेला नाही त्यातच ही तिसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे हे तिघेही अत्यंत गरीब कुटुंबातील असून मजुरीवर आपला उदरनिर्वाह करतात.दरम्यान, या तिन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुचाकी जाळल्याने संबंधित वाहनधारकांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, त्यांच्या कुटुंबीयांवर त्याचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रात्री नशिराबाद पोलिसांना कळविण्यात आले.स्थानिक नागरिकांनी याविषयी प्रशासनाकडे लक्ष वेधले असून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करून चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.तसेच रात्रीच्या वेळेस गस्त वाढवून या टवाळखोर अथवा माथेफिरूनचा कायमचा बंदोबस्त करावा.अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

