जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर तालुक्यातील तासखेडा परिसरातील हतनूर कालव्याच्या माती चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध विधान परिषदेत विशेषाधिकार भंगाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. आमदार Eknath Khadse यांनी दिलेली विशेषाधिकार भंगाची सूचना सभापतींनी स्वीकारल्याने या प्रकरणाची चौकशी आता विधान परिषद विशेषाधिकार समितीकडे सोपविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारात हतनूर कालव्यातील मोठ्या प्रमाणात मातीची अवैध चोरी झाल्याचा मुद्दा आमदार खडसेंनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. शासनाने सुमारे ४ हजार ५६५ ब्रास मातीची चोरी झाल्याचे मान्य केले असतानाही या प्रकरणी संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती.दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार खडसे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सावदा पोलीस ठाण्यात गेले असता, तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी लोकप्रतिनिधींशी उद्धट आणि अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तपास सुरू असून हस्तक्षेप करू नका” असे मोठ्या आवाजात सांगत लोकप्रतिनिधींना अपेक्षित असलेली सन्मानाची वागणूक न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आपल्या दीर्घ राजकीय व सामाजिक कारकिर्दीवर परिणाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही खडसेंनी केला आहे. या घटनेची दखल घेत विधान परिषद सभापतींनी विशेषाधिकार भंगाची सूचना ग्राह्य धरली असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

