मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी जनगणना २०२६चे काम सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर तात्पुरती स्थगिती लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, जिल्हा परिषद अंतर्गत गट-क (Group C) व गट-ड (Group D) संवर्गातील कर्मचाऱ्यांची २०२६ सालची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामध्ये जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.
जनगणना कार्य हे व्यापक व संवेदनशील असल्याने संबंधित मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने नमूद केले आहे. तसेच, या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) देण्यात आल्या आहेत.हा निर्णय जनगणना अधिनियम १९४८ व जनगणना नियम १९९० अंतर्गत प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने घेण्यात आला असून, प्रशासनिक कामकाजात सातत्य राखण्याच्या दृष्टीने याला विशेष महत्त्व दिले जात आहे.
उप सचिव वैशाली डिगे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून, संबंधित यंत्रणांनी त्वरित पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

