जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचे भीषण परिणाम दिसून येत आहे.आज एक शेतकरी शेतात काम करत असतांनाच उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावल तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी शेतकऱ्याचा येथून जवळ असलेल्या चोपडा तालुक्यातील मितावली येथे शेतातील काम करीत असताना तिव्र उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १३ मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे.परिसरात या घटनेने दुःख व्यक्त केले जात आहे. उष्माघाताने मरण पावलेले मनवेल येथील रहिवाशी हुकूमचंद लक्ष्मण पाटील (वय ६७ ) हे आपल्या मितावली येथील शेतात जे.सी.बी. मशीनने शेतातील कामे करीत होते. उन्हाचा कडाका असह्य होत होता.वाढत्या तिव्र तापमानामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर काही मिनिटांमध्येच त्यांचा शेतातच मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मनवेल येथे सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. मयत शेतकरी हुकुमचंद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. दरम्यान, येत्या काही दिवसापर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान अमळनेर , पाचोरा आणि रावेर येथेही उष्माघाताचे बळी पडले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.