जळगाव/तुषार वाघुळदे/कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक केळी आणि कापूस आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे हे शासन आहे,शासन सकारात्मक निर्णय घेत असते असे सांगून केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्य सरकार 100 कोटी रुपये देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. जिल्ह्यासाठी केळी विकास महामंडळासाठी ही घोषणा करण्यात आली. पोलिस कवायत मैदानावर आयोजित ‘शासन आपल्या दारी’ (सरकार तुमच्या दारी) या दहाव्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्रीगण शहरात आले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी मित्तल यांच्यासह विविध विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारने जनहिताची कामे केली आहेत, असे देखील प्रतिपादन केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, केळी विकास महामंडळासाठी राज्य शासनाकडे स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने सिंचन आणि इतर विकासकामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. या आधी सुद्धा जळगाव शहरासाठीही मोठा निधी दिला आहे. खड्डेमुक्त जळगावसाठी शहरातील रस्ते काँक्रिटचे करावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना श्री.महाजन म्हणाले की, राज्यातील अनेक समस्या सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे, कापसाचा प्रश्न गंभीर असून काही समस्या अजूनही प्रलंबित आहेत. राज्य सरकारने कापसाच्या भावात वाढ करावी, अशी मागणी सुध्दा त्यांनी केली. दरम्यान, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे (खेवलकर ) आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत लाभार्त्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात येऊन विविध योजनेच्या बाबत लाभ घेण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.