पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात सासरच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. पाचोरा येथे अशीच घटना घडली आहे.घरानजीक असलेल्या विहिरीत उडी घेत एका १९ वर्षीय नवविवाहितेने गोविंदनगर भागातील राहत्या घरात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यानेच तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप माहेरील मंडळींनी आरोप केला आहे.
तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा ता.जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस आजल सासू सुग्राबाई चव्हाण, सासू मुक्ता चव्हाण, चुलत सासू पार्वती चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचून व टोमणे मारत बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणाऱ्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा १० जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंदनगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता.दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली. काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश केला. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचे माहेरच्या मंडळींनी सांगितले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सासरच्या मंडळींच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.