नाशिक/पोलीस दक्षता लाईव्ह:- -केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केल्याने निर्माण झालेली कोंडी बुधवारी फुटली. बंदर आणि बांगलादेशच्या सीमेवर अडकलेला हजारो टन कांदा विनाशुल्क निर्यात करण्याबाबत तोडगा काढण्याच्या केंद्राच्या आश्वासनानंतर कांदा व्यापारी संघटनेने गुरुवारपासून बाजार समित्यांमधील लिलावात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सलग तीन दिवस बंद राहिलेले कांद्याचे लिलाव आजपासून पूर्ववत होतील.कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला होता. त्याचे स्थानिक पातळीवर संतप्त पडसाद उमटले. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी घेतलेल्या निर्णयास उत्पादकांनी विरोध दर्शवला. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यामुळे तीन दिवसांत सुमारे अडीच लाख क्विंटल कांद्याची खरेदी-विक्री होऊ शकली नाही. निर्यातशुल्कावरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये दुफळी पडली. राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी दर नियंत्रणास आक्षेप नोंदवला. याबाबत जिल्हा प्रशासनाने मंगळवारी केलेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा व्यापारी संघटना, बाजार समिती आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रितेश चौहान हे उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र रोष व्यक्त केला.
कांदाकोंडी फुटली: निर्यात प्रक्रियेतील कांद्याच्या सवलती बाबत तोडग्याचे आश्वासन
RELATED ARTICLES