धडगाव | प्रतिनिधी| पोलीस दक्षता लाईव्ह:- धडगाव तालुक्यातील प्रमुख प्रवास केंद्र असलेल्या एस.टी. बसस्थानकात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांसह शाळकरी विद्यार्थिनींना शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सदर समस्येकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.बसस्थानकाचे उद्घाटन होऊन तब्बल १२ महिने उलटले असले तरी अद्याप शौचालय व स्वच्छतेच्या मुलभूत सुविधा कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे महिलांना व विद्यार्थिनींना अत्यंत अपमानास्पद व अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
महामंडळाकडून “प्रवासी दिन” साजरा करताना जाहिरातबाजी केली जाते, मात्र धडगावसारख्या प्रमुख बसस्थानकावर मूलभूत सोयींची वानवा असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अक्राणी शाखेकडून बसस्थानक प्रमुखाला निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, “पुढील ५ दिवसांत स्वच्छतागृह व पाण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्यास, मनसेकडून धडगाव बसस्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल. यास सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राहील.”
सदर निवेदनाची प्रत जिल्हा प्रमुख, विभाग नियंत्रक, व्यवस्थापकीय संचालक (एस.टी. महामंडळ), मा. जिल्हाधिकारी नंदुरबार, तहसीलदार धडगाव आणि पोलिस निरीक्षक, धडगाव पोलिस ठाणे यांना कारवाईसाठी सादर करण्यात आली आहे.