नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगावकडून नशिराबादकडे येणाऱ्या बसस्थानक मार्गाचे नुकतेच नूतनीकरण झाले असले, तरी या मार्गावर पथदिव्यांची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. परिणामी, सायंकाळी अंधार पडल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना भीतीदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
पेठ, रायसोनी नगर आणि सावता नगर परिसरातील अनेक विद्यार्थी शाळा व शिकवणीवरून परतताना अंधारामुळे अस्वस्थता व्यक्त करत आहेत. पथदिव्यांचा अभाव असल्याने केवळ अंधारच नव्हे, तर अलीकडे वाढलेल्या चोऱ्या व संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
याच मार्गावर ग्रामीण रुग्णालय असल्याने रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांसाठी ये-जा करणाऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागते. अंधारामुळे अपघातांची शक्यता वाढत असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन पथदिवे बसविण्याची मागणी केली आहे. “मार्गाचे सौंदर्यीकरण झाले, पण सुरक्षेची सोय नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पथदिवे बसवावेत,” अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

