भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- विद्यार्थ्यांना सुट्टी लागल्याचे कारण देत एसटी महामंडळाने बंद केलेल्या भुसावळ-वराडसीम, चोरवड, गोजोरा, सुनसगाव व बेलव्हाळ मार्गावरील बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यासह प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या दखलीमुळे अखेर एसटी महामंडळाने निर्णय घेत बस सेवा सुरळीत सुरू केली.बस सेवा बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच आबालवृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. शासनाच्या महिलांसाठी अर्धे तिकीट व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनांचा लाभही नागरिकांना मिळत नव्हता. या समस्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजी होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पाटील, युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, विकासो सदस्य विजयसिंग पाटील, गोजोरा येथील सरपंचपती लक्ष्मण कोळी व उपसरपंच चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागीय परिवहन व्यवस्थापक राकेश शिवरे यांना लेखी निवेदन सादर केले.निवेदनात महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांनीही या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष वेधत बातमीची दखल घेतली. अखेर एसटी महामंडळाने सकारात्मक निर्णय घेत बंद असलेली भुसावळ-गोजोरा-वराडसीम बस सेवा पुन्हा सुरू केली.याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी एसटी महामंडळ व प्रसारमाध्यमांचे आभार मानले. तसेच भुसावळ-सुनसगाव, बेलव्हाळ व गोंभी मार्गावरील बस सेवा देखील नियमित सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

