नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कुंभार वाडा परिसरातील अर्धवट व धोकादायक अवस्थेतील विहिरीचा प्रश्न समोर आल्यानंतर नशिराबाद नगरपरिषद प्रशासन सक्रिय झाले आहे. स्थानिक पातळीवर वाढत्या धोक्याची दखल घेत नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित विहीर तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
सदर विहीर मुख्य रस्त्यालगत असून दीर्घकाळापासून निष्क्रिय अवस्थेत आहे. विहिरीत गटारीचे सांडपाणी झिरपत असल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, रस्त्याच्या मधोमध असलेल्या या विहिरीमुळे पादचारी, लहान मुले तसेच जनावरांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.नगराध्यक्षांनी प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करत ही विहीर तातडीने बुजविणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. संबंधित यंत्रणांनी विलंब न करता योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या प्रकरणाकडे लक्ष वेधल्यानंतर प्रशासन हालचालीत आले असून लवकरच ठोस निर्णय होईल, अशी आशा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

