जळगाव (भादली बु.) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकारातून भादली बु. येथे राबविण्यात आलेल्या ‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रमास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात त्यांनी कोणताही शासकीय औपचारिकतेचा आव न आणता शेतकऱ्यांसमवेत जमिनीवर बसून आधुनिक शेती पद्धती व पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापनाचे मार्गदर्शन घेतले व दिले.या वेळी त्यांनी उत्पादन खर्चात कपात करून अधिक उत्पन्न मिळवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच पारंपरिक पिकांसोबतच चिया, धने, करडई यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळण्याची गरज अधोरेखित केली. आगामी खरीप हंगामात कापूस, मका, तूर, उडीद, केळी आदी पिकांवर आधारित सविस्तर शेतीशाळा जिल्हाभर आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना घरगुती बियाण्यांचा वापर, पेरणीपूर्वी उगवण चाचणी, बीजप्रक्रिया, आंतरपीक पद्धतीचा अवलंब तसेच पिवळे व निळे चिकट सापळ्यांद्वारे कीड नियंत्रण करण्याचा सल्ला देण्यात आला. ‘डिजिटल शेती शाळा’मुळे मोबाईलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान व समस्यांचे तत्काळ निराकरण शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी सांगितले की, आगामी खरीप हंगामासाठी गावनिहाय नियोजन पूर्ण झाले असून त्यानुसार विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला कृषी विभागातील विविध अधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाल ढाके यांनी केले.जिल्हाधिकाऱ्यांनी साधेपणाने शेतकऱ्यांमध्ये मिसळून संवाद साधल्यामुळे उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली. प्रशासनाने थेट शेतपातळीवर येऊन केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, यामुळे ग्रामीण शेती आधुनिकतेकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

