जळगाव (तरसोद) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान अभियान’ अंतर्गत मौजे तरसोद येथे दिनांक 17 एप्रिल रोजी समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते, तर तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शिबिरास व्हिडिओ अधिकारी साहेबराव पाटील, सरपंच संतोष सावकारे, गणपती मंदिर अध्यक्ष सुभाष बराटे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद इंगळे, अनुकूलन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण दांडगे, संतोष कोळी, ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या शिबिरात ग्रामपातळीवरील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, इंडियन पोस्ट, कृषी विभाग, तहसील कार्यालय तसेच ग्रामपंचायत यांच्यामार्फत विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. शालेय विद्यार्थी व विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले, तर महिला व बालविकास विभागाकडून सुमारे 23 लाख रुपयांच्या योजनांचा लाभ देण्यात आला. याशिवाय, स्थानिक तरुणांच्या लोकसहभागातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.शिबिरात वारस नोंद, सातबारा उतारे, जात व उत्पन्न प्रमाणपत्रे, घरकुल योजना आदी विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

